Archive for the सारे प्रवास घडीचे Category

कोकणचित्रं

Posted in Kokan, सारे प्रवास घडीचे on July 3, 2006 by wanderanade

केळशी गाव आहे अरुंद गल्ल्यांचं. वाट विचारत विचारत महालक्ष्मीच्या देवळाकडे निघालो. देवळापुढे एकदम रस्ता संपला. दोन्ही बाजुला झाडी. समुद्रावरुन येणारा खारा वारा जाणवत होता. डावीकडे दुरवर माड – पोफळ पोहोचलेले. त्यातुन डोकावणारा याकुतबाबांच्या दर्ग्याचा मीनार. समोर सुबकसं महालक्ष्मीचं देउळ. गोल घुमटाचं. प्रवेशद्वारावर नगारखाना. फरसबंद परिसर. आवारात चाफ्याची झाडं. चाफ्याची झाडं आणि देउळ यांना एकमेकांमुळे शोभा येते. एक दुस-याशिवाय अपुरं वाटतं. त्या निरव शांत स्थळी जणु महालक्ष्मी तप आचरत आहे.

आंजर्ल्याला साठ्यांकडे अगदी घरगुती जेवण झालं. केळीचं आडवं पान. भात-पिठलं, डांगराचा गोळा, लोणचं आणि आंबट ताक. काकू रांधायला आणि पट्टेरी चड्डी घातलेले काका वाढायला. (मला गौरीच्या पुसाळकारांची आठवण झाली) सगळ्यांनी आडवा हात मारला.

आंजर्लाला खाडीवरचा पुल ओलांडला. मॊठा देखणा परिसर आहे. एकीकडे चकाकणारा करडा अरबी समुद्र. दोन्ही बाजुला पुळणी, सुरुची झाडं. माडापोफळीच्या बागा, दुरुन दिसणारं कड्यावरच्या गणपतीचं देउळ.

पुढे हरणेची कॊळी वस्ती. इथॆ किना-यालाच समुद्र खोल आहे. किना-याला लागुन कोळ्यांची घरं, बाहेर ओढुन ठेवलेल्या होड्या. एवढ्याश्या पुळणीवरुन समुद्रात पोहणारी २० – २५ कोळी पोरं अगदी सी गल्स च्या टोळीसारखी डुंबत होती.

कर्दं उजवीकडे ठेवुन घाट चढायला लागलो. आसुदच्यापुढे व्याघ्रेश्वर. तिन्ही बाजुंनी डोंगरांनी वेढलेलं, नदी किनारचं टुमदार देउळ. गाभा-याला हेमाडपंथी शिखर. सभामंडप मात्र कौलारु. आवारात असलेले अवशेष आणि काळे चिरे गतवैभवाची साक्ष देतात.

डोंगरांच्या ओंजळीतुन वाहाणारी झुळुक उन्हाळ्याचा विसर पाडत होती. `शंभो हर हर’ म्हणत आम्ही दापोली पोलादपुर मार्गे महाबळेश्वरी निघालो.

दिवे आगरचा प्रसंग

Posted in Kokan, People, सारे प्रवास घडीचे on June 29, 2006 by wanderanade

या मे महिन्यात आम्ही सगळी रानडे मंडळी कोकणस्वारीला गेलो होतो ना तेंव्हाची गोष्ट. आम्ही नऊ जण होतो. मुक्कम होता दिवे आगरच्या वाडीत. रात्रीची वेळ. दरवाजावर टकटक. आत झोपलेल्या चौघांपैकी एकाला जाग येते. परत टकटक.

`कोण आहे’ ला उत्तर नाही.

दुसरीला जाग येते. उरलेल्या दोघांना पत्ता नाही. परत दार वाजवल्याचा आवाज.

`कोण आहॆ?’ … शांतता..

उठुन खिडकीतुन डोकावुन बघितले तर बाहेर कुणीच नाही. नुसती रातकिड्यांची कीरकीर.

दुस-या दिवशी शेजारच्या खोलीत झोपलेल्या आजी सांगतात की त्या रात्री उठल्या तर त्यांच्या खोलीचा दरवाजा सताड उघडा. झोपायला जाताना तर बंद केला होता.

प्रकरणाचा उलगडा होईना. ड्रायवरने फोडणी दिली, `रात्री मला पण कोणीतरी बाहेर असल्याचा भास झाला. गाडीत झोपलॊ होतो तर मागुन कोणीतरी येतंय. चेपलो जतोय असं वाटलं. मी टरकलो. म्हटलं ‘मरु दे’ चादर डोक्यावरुन घेउन झोपुन गेलो’ (कोण मरु दे? हा का भूत? कोणास ठाउक?)

चौघांना एकाच रात्रीत आलेले अनुभव. बाकीच्यांना काहीच कल्पना नाही. काय घडले असेल याचा बराच खल झाला. पण सर्वांना समाधानकारक वाटेल असे स्पष्टीकरण मिळेना. मग तिथुन संभाषण इतर किस्स्यांकडे वळले.

कोकणात प्रत्येक घरच्या अश्या अद्‍भुत कथा असतात. पु.ल. म्हणतात तसा देवाआधी देवाचराला नमस्कार घडतो. आम्हाला आमची कथा मिळाली.